Site Meter

Saturday, 21 April 2012

शिक्षण क्षेत्र आणि आरक्षण ...

शिक्षण क्षेत्र आणि आरक्षण

आरक्षण हा विषय थोडा नाजूक आहे. बऱ्याच जणांचा त्याला विरोध आहे आणि त्या बद्दल मी त्यांच्या मतांचा आदर करतो. जसं मला मत आहे, तसं ते इतरांना देखील आहेचं की. त्या मुळे सर्वांनी माझ्या म्हणण्यानुसार चं करायला हव, असा काही आग्रह नाही. पटल तर बघा, नाही तर सोडून द्या. पण वादावादीच्या फंदात पडू नका. कारण वेळ आधीच कमी आणि वादावादीतून काही साध्य होईल अस ही नाही. आधीच आपली कल्पना दिलेली बरी.
या आधीच मी आरक्षण हव हे मत मांडलेल असताना, त्यात काही खुलासा करावा अस वाटलं म्हणून हा खटाटोप. माझ्या मते काही विशेष क्षेत्रात आरक्षण हे नसाव. उदाहरणार्थ शिक्षण, आरोग्य, इत्यादी. गुणवत्तेच्या आधारेच अशा महत्वाच्या क्षेत्रात नोकरी द्यावी. अन्यथा आपण आपल्या आणि येणाऱ्या भावी पिढीच्या पायावर कुऱ्हाड मारल्या सारख होईल. ब्राम्हण आणि इतर पुढारलेल्या मंडळीनी मागासवर्गीयांना कमी नं लेखता, त्यांना मानाची वागणूक द्यावी अन त्यांना देखील प्रगती करता यावी यासाठी मदत करावी. आरक्षण हे कायम स्वरूपी नसून, ते एक कालमर्यादेसाठी असावे. अन्यथा ती एक गंभीर समस्या बनेल. गेल्या काही महिन्यात बरेच राज्यात जे बंद झाले ते बघून खूप चिंता वाटते. मागासवर्गीय म्हणून आपल्या जातीला मान्यता मिळावी या साठीचे हे बंद होते. अशी जर मानसिकता असेल तर खूप कठीण आहे. मला सगळेचं राजकीय पक्ष सारखे आहेत. पण जर स्वातंत्र मिळाल्याच्या ६४ वर्षानंतर देखील जर असे बंद होत असतील, तर भारतामध्ये नक्की विकास कोणाचा झाला हा प्रश्न आहे.

Tuesday, 20 March 2012

मराठी कविता - सावली माझी अचानक रुसली ...

सावली माझी अचानक रुसली, 
फद्कल मारून ट्रेन मधे बसली. 
म्हटलं इथे आपल भांङण नको,
लोकाना फुकटचा तमाशा नको.

म्हणते कशी, मला छानसा मोबाइल दे,
नोकिया नाही आय फ़ोन दे.
दमदाटी करून विचारल तिला, 
मोबाइल तू ग अस काय करणार?

हळूच लाजत सावली म्हटली,
समोरच्या मंजूला SMS टाकणार.
खर्चाच गणित मांडून म्हटलं, 
इतक्याशा पगारात कसपरवडणार?

रंग एक सोडला तर ... रंग एक सोडला तर,
सावली पूर्ण माझ्यावर  गेली.
बर्या बोलानं देतोस का,
म्हणुन चक्क धमकावुन गेली.

नाही देत जा, नाहीच दिला,
तर काय तू करशील.
अग सोडलं मी तुला,
तर तू कुठे उरशील?

गाडी ठाणे स्टेशनात शिरतचं होती,
अन सावलीने संधी नेमकी हेरली.
दारात तिने माझा अंगठाच ठेवला,
गर्दीतल्या प्रत्येकाने त्यावर चप्पल ठेवली.

दुखण्याने मी आर्त किंकाळी फोडली,
अन बाजूची पोर घाबरून रडायला लागली.
शेजारची बाई पार धांदरून गेली,
अन दुधाची बाटली तिने माझ्या तोंडाला लावली.

सुजलेला अंगठा अन तोंडात बाटली... सुजलेला अंगठा अन तोंडात बाटली
माझा अवतार बघण्यासारखा होता.
पण मुलुंडला माझ काय होईल,
याचा विचार मला खरच करवत नव्हता.

अजून तमाशा नको म्हणून,
लगेच खिशातून मोबाईल काढला.
अन सावलीच्या हाती मोबाईल देऊन,
सुटकेचा मी सुस्कारा टाकला.

७.२७ ची ट्रेन मी कधीच सोडली,
ट्रेन आली की कससंच होत.
सगळ्या सावल्या माझ्याकडे बघतात,
अन कुजबुजत साऱ्या फिदीफिदी हसतात.

मंजू हल्ली फार दिसत नाही,
अन दिसली तरी हसत नाही.
कसं सांगू तिला ते SMS माझे नसतात,
अन ते तिच्यासाठीही नसतात... अन ते तिच्यासाठीही नसतात...



Sunday, 18 March 2012

न केलेला गृहपाठ...

टिळकनगर शाळेतील दहावीचा वर्ग. मी वर्गात साधारण मागून तिसऱ्या रांगेतील बाकावर चिमण शेजारी बसायचो. चिमण म्हणजे माझा खास दोस्त (अजय जोशी). खिडकी जवळील बाकांची रांग रिकामीच असायची. पुढे दीपक कोगजे अन मिलिंद बोराडे, तर उजवीकडे प्रगती मुळे आणि बहुदा विद्या कुलकर्णी (आता नीटस नाही आठवत) मागे नीरज परिहार. मुली शाळेतील हुशार अन आम्ही मध्यम सदरात मोडणारे विशेषत: अभ्यास बिलकुल नं करणारे म्हणून कुप्रसिध्द. शाळा व खासगी शिकवण्या या सगळ्याच ठिकाणी गृहपाठ न केल्याने होणाऱ्या शिक्षेचे विशेष अनुभवी बळी.
विषय इंग्रजीचा. नक्की आठवत नाही. पण वाटत की अत्रे बाई शिकवायला होत्या. चला काल शिकवलेल्या धड्याखालील प्रश्नांची उत्तर सांगा बर, असा बाईंचा आदेश आला. आता झाली का बोंब. क्रिकेट आणि इतर महत्वाच्या गोष्टीमध्ये हा गृहपाठ राहिलाच की. इंग्रजी हा आपला आवडता विषय. परत त्यात सगळ्यांच्या सारखा आपला देखील अभ्यासक्रम खाजगी शिकवणीत आधीचं झालेला. आपला नंबर आज न लागवा हीच चिंता. कोणी कोणी अभ्यास केलेला नाही? या वर एखाद दोन हात वर, आणि त्या नंतर त्यांनी खालेल्ला ओरडा किंवा मार. आज आपण सरळ गुन्हा कबुल करावा की गपचूप रहाव या विचारांचे मनात युद्ध सुरूच. प्रश्न हळूहळू दुसऱ्यांच्या खाती जात असल्याचा आनंद टिकतो न टिकतो, तोच पुढला प्रश्न ताठरे तू उत्तर दे असा अध्यादेश जारी झालेला.
मी उभा राहिलो तशी माझी कोरी वही मला वाकुल्या दाखवू लागली. उत्तर की आजही शिक्षाचं अशा सगळ्यांच्या प्रश्नार्थक नजरा माझ्याकडे रोखून पाहत होत्या. मी पान मागे चाळून प्रथम प्रश्न वाचला. परत पाने पुढे चाळून उत्तर कुठे लिहीले आहे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो आहे अस दर्शवले. चिमण, प्रगती आणि इतर मुली माझ्या कोऱ्या वहीतील उत्तर शोधण्याच्या गुन्ह्याचे साक्षीदार की भागीदार याचा निर्णय ठरवण्यात गुंग. अन मी ठाम पणे उभा राहून न केलेल्या गृह्पाठातील उत्तर अगदी धडाधड कोऱ्या वहीत बघून बाईना सांगितले. बाईंच्या चेहऱ्यावर समाधान अन चिमण, प्रगती व इतरांच्या डोळ्यात आश्चर्य. आणि आपण काही केलेच नाही या थाटात स्वारी स्थानापन्न! काळ बदलला आहे, विषय बदलले आहेत. वही आजही कोरीच असते, पण गुन्ह्याचे साक्षीदार बदलेले आहेत.

Saturday, 17 March 2012

शतकांचे महाशतक!

ऑफिस मध्ये दुपारी जेवणा आधी समीर माझ्या डेस्क पाशी आला आणि त्याने माझे अभिनंदन केले. वाटलं की भारताने आज सामना जिंकला असावा आणि आशिया करंडकातील अंतिम सामन्यातील स्थान नक्की केल असावं. पण समीर म्हटला अरे १०० व शतक झाल आज. माझा खर तर विश्वासचं बसेना. बांगलादेश विरुध्दच्या सामन्यात सचिनचं महाशतक झळकल्याची बातमी वाचली, आणि खूप खूप आनंद झाला. नशीबवान लोकांनी हा क्षण अनुभवता आला असेल. म्हटलं बघु आपल्याला ही कुठे काही video पहावयास मिळतो का म्हणून. आणि कामातुन सवड काढून जेवणाच्या वेळी सचिनच्या महाशतकाच्या क्षणाची झलक बघायला मिळाली. सचिनने ज्या वेळी आकाशाकडे पाहून देवाचे आभार मानले, त्या वेळी खर तर डोळे भरून आले माझे. आम्हा सर्वचं चाहत्यांना किती आनंद झाला हे सांगता येणार नाही. 
वयाच्या  ३८ वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये खेळू शकणे किती कठीण आहे, हे सचिन वर सतत टीका करणाऱ्या लोकांना नाही कळणार. सचिनच्या शतका नंतर देखील भारत हरल्यावर जे नको तेचं झाल. टीका करणाऱ्यांची तोंड पुन्हा सुरूच. सचिनच्या मंद खेळी मुळे धावा कमी झाल्या म्हणे. पण जर अशी गोलंदाजी आपण करणार असू तर ३५० धावा ही अपुरयाच आहेत की आपल्याला. बांगलादेश काय तर म्हणे दुबळा संघ आहे. अरे १०० शतका मधील ८१ शतक सचिनने ऑस्ट्रेलिया, दाक्षिण आफ्रिका, श्रीलंका, इंग्लंड , पाकिस्तान, वेस्ट इंडीज विरुद्ध ठोकली आहेत, याचा तुम्हाला विसर कसा पडतो? याच दुबळया संघाने एकदा विश्व करंडकातून भारताला डच्चू दिला होता हे तुम्हाला आठवून द्यायची गरज नाही. काही झाल तरी सचिन वर नेहमी टीका करणाऱ्यांची मला खरच  कीव येते. आयुष्यात स्वत: काही तरी करून दाखवा आणि मग दुसऱ्यावर टीका करा.
सुनील गावसकर ज्या वेळी निवृत्त झाले, त्या वेळी माझ्या मनात प्रश्न आला की आता भारतीय क्रिकेटचं कसं होणार. पण ती शंका सचिनने मिटवली. त्याच प्रमाणे सचिन नंतर पुढे कोण, हा प्रश्न देखील कोणी न कोणी तरी नक्की सोडवेल. शेवटी जग काही कोणासाठी थांबत नाही, पण सुनील गावसकर, विवियन रिचर्ड्स, सचिन तेंडूलकर, ब्रायन लारा ही अशी काही नाव आहेत, ज्यांची आठवण नेहमी येत राहील. असे दर्जेदार खेळाडू क्रिकेट मध्ये वारंवार यावेत हीच इच्छा!

Sunday, 19 February 2012

रघुनाथ धोंडोपंत कर्वे...

समाज प्रबोधनासाठी रघुनाथांनी आयुष्यभर केलेल्या कामावर आधारीत ध्यासपर्व हा मराठी चित्रपट पाहीला. आजच्या काळात निरोध, संतति नियमन यावर सुशिक्षित तरुण तरुणीस काही सांगायची गरज नाही. परंतु १९२१ व्या साली संतति नियमनाचे भारतातील पहिले केंद्र उभारणे किती अवघड काम होते, हे सांगायची गरज नाही. रघुनाथ हा भारत रत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा मोठा मुलगा. १८९१ साली रघुनाथ यांची आई (राधाबाई) यांचा प्रसुती काळात मृत्यु झाला. वयाच्या ९ व्या वर्षी घडलेल्या या घटनेमुळे रघुनाथ रावांचा गर्भधारणा या विषयाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. पुढे मोठे झाल्यावर 'दर वर्षी हलणारा पाळणा हा स्त्रियांच्या प्रगतीस मारक ठरत असल्याच' त्यांच्या लक्षात आल. पुढील काळात लैंगिक सबंध, संतति नियमन अशा संवेदनशील विषयाला हात घालुन, जन कल्याणासाठी रघुनाथांनी आयुष्य वाहीले.
त्यांच्या या कार्यात अनेक अडथळे आले, पण रघुनाथ कधीच मागे हटले नाहीत. जनसामान्यांच्या विरोधाची  परवा सोडा, त्यांनी तर संतति नियमना बद्दल गांधी अन नेहरू यांच्या चुकीच्या मतांवर देखील टीका करण्यास मागे पुढे पाहिले नाही. रघुनाथांवर न्यायालयात ही खटले भरले गेले. दुसऱ्या खटल्याच्या वेळी बाबा साहेब आंबेडकरांनी रघुनाथांचे वकीलपत्र स्वीकारले, पण त्या वेळी त्यांच्या विरोधातचं खटल्याचा निकाल लागला. १९५३ साली रघुनाथांचे निधन झाले, पण त्यांनी अखेर पर्यंत जन जागरणाच्या कामास स्वत:ला वाहून घेतले होते.
मला  शाळेत शिकवलेल्या अभ्यासक्रमात रघुनाथ धोंडोपंत कर्वे यांच्या वर धडा होता अस राहून राहून वाटत आहे. इतक्या वर्षांनी नाही नीटस आठवत. पण प्रामाणिक पणे सांगावास वाटते की रघुनाथरावांसारखे किती तरी महापुरुष आपल्या इतिहासात होऊन गेले असतील, पण आज आपल्याला अशा महापुरुषांच्या कार्याची आणि त्यांनी केलेल्या त्यागाची आठवण देखील नसावी हे योग्य नाही. आपल्या पुढील पिढीला या थोर माणसांची ओळख आपण करून द्यायलाच हवी. ध्यासपर्व हा मराठी चित्रपट जरूर पहावा.

Friday, 25 November 2011

Hello! Good Evening!

आज काल थंडी सुरु झाल्याने लवकर अंधार पडतो. संध्याकाळी ५ वाजताच ७ - ८ वाजल्या सारख वाटत. त्यात मी काल घरी आलोच उशीरा. आणि रस्त्यावर पाहतो तर एक पार्कींग तिकीट देणारा पोलीस मला दुरवर दिसला. म्हटलं इतक्या रात्री हा नक्की काय करतो आहे. जसं जसा तो जवळ येउ लागला तसं माझ्या लक्षात आल की, हा तर पोलीस आहे. मुंबई पोलीसांचा दरारा अजून ही मनात असल्याने मी जगाच्या पाठीवरील सगळ्या पोलिसांकडे  आदरयुक्त भीतीने पाहतो. तर लंडन चा हा पोलीस माझ्या जवळ आला आणि मला Hello Good Evening म्हणाला. मी देखील त्याच्याशी थोडसं बोललो आणि मग घरी आलो. पण मनात मात्र एका प्रश्नाने घर करायला सुरुवात केली होती ती म्हणजे, "आपल्याकडे पोलिसांची असलेली भीती कितपत योग्य आहे?"

१ बिलीयन म्हणजे नक्की किती रे भाऊ?

भूकंप आणि भूकंपाच केंद्रस्थान याच्याशी माझ काही तरी विशेष नात असल्याचा मला दाट संशय येतो आहे. आर्थिक भूकंपांबद्दल सांगायचं झाल तर २००८ आणि २०११-२०१२ च्या आर्थिक भूकंपाच्या केंद्रस्थानी असण्याचा राजयोग आमच्या हातावर आहे अस कोणा जोतिष्याने मला आधी सांगितलं असत तर माझा विश्वास बसला नसता. 
नुकत्याच एका सभेत मी गेलो होतो आणि तिथून बाहेर पडल्या वर मला प्रथम माझी लाज वाटू लागली कारण मला साध १ बिलिअन म्हणजे नक्की किती असा प्रश्न पडला. मी माझ्या शेजारयास विचारले, "१ बिलिअन म्हणजे नक्की किती रे भाऊ?" तो वर पासून खाल पर्यंत मला न्याहाळून बहुदा मनातल्या मनात म्हणाला, "साले कुठून कुठून येतात हे लोक!" वर वर हसत तो म्हटला सोप आहे खूप. त्याने माझे दोन्ही हात hands up केल्या वर जसे वर करतात तसे वर करून दाखवले. आणि म्हटला, "तुझ्या डाव्या हाताची करंगळी म्हणजे १ आणि बाकी सगळी बोट म्हणजे ०. बस आहे काय आणि नाही काय? यालाच तर बिलीयन म्हणतात." माझ्या त्या हातांकडे बघून मला खूप हसू आले, कारण ऐकण्यात येणारे आकडे हातावर मोजता येतील हा माझा अंदाज पार चुकला होता. कारण १ बिलीयन हा तर फार छोटा आकडा होता. आणि गम्मत म्हणजे माझे दोन्ही हात हिंदी सिनेमातील पोलिसांसमोर शरण येणाऱ्या गुम्हेगारा सारखे होते. नशीबाने अभाव होता तो हातातल्या बेड्यांचा.